Thursday, July 21, 2016

काळ आला होता... वेळ आली नव्हती..

तीन वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे. अशीच जून-जुलै मधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयाण अनुभव. 
.
आम्ही चौघं इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहचलो. कारंजा म्हणजे दत्तसंप्रदायातील महत्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे १५० किमीवर असलेल्या माहूरला निघायचं, असं ठरलं होतं. पण पावसामूळे आणि गाडीने नाटकं केल्याने कारंजात पोहचायला रात्रीचे ८ः३० वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत १०:०० झाले...  पाऊस सुरूच होता... गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम... त्यामुळे पुढे जावं की नाही, हा प्रश्न होता. हो हो नाही नाही करत १०ः३० वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं... ड्रायव्हिंगचं तसं टेंशन नव्हतं... पण तो भाग आम्हाला नवा होता, शिवाय पाऊस... ! सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती... म्हणून हळू हळू पोहचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच... त्या आधी मंदीराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला शेगांवला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरोबर घेतलं आणि बसस्थानकात सोडलं...
तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सिटवर एक बॅग दिसली. त्या गुरुजींची बॅग राहील्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो, पण त्यांना बहूतेक गाडी मिळाली होती. त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करुन कळवू म्हणत ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली.... निघालो. आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरु झाला.
वेळ : रात्री ११, पाऊस आणि काळोख...
.
कारंजा ते माहूर हा ११० किमीचा रस्ता तसा आडमार्ग... शांतच ! कारंजा सोडलं की १० किमीपासूनच जंगल सुरु होतं. क्वचितच एखादी गाडी दिसते. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयाण शांतताच सोबत असते. आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि भयाण शांतता, त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही... परत अश्यात गाडी बंद पडली तर कल्याण ! थोडी भिती वाटायला लागली... उडी घेतली होती, त्यामुळे या भितीला अर्थ नव्हता... गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला, पावसातला शक्य तो टॉप स्पीड गाठला... पण कारंजा ते मानोरा असा ४० किमी प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली. म्हणून मानोरात थांबलो... चहा घेतला.
वेळ : रात्री १२
.
तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो... किमीचे दगड वगैरे होते. ५०- ५५ कि मी गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले. त्याठिकाणी एक सेकंड थांबलो...
कुठे जायचं ?
तिथे दर्शक फलक नव्हता...
मला कन्फ्यूज झालं.
एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता. दुसरा जरा तिरपा. 
.
सरळ रस्ता पकडून गेलो... 
पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना... ना कुठलं गांव... इतर गाड्यांचा भास पण नाही... फक्त भयाण काळोख, आणि पाऊस... आणि समोरचा रस्ता... आम्ही रस्ता चुकलो होतो... फिरुन मागे यायचं शक्य होत नव्हतं... (डोक्यात येत नव्हतं)
रात्रीचे दिड वाजले होते... त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती... पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी... आणि फूल व्हॅल्यूममध्ये गाणे... एव्हाना सगळे जागे झाले होते... चौघंच असल्याने वैयक्तीक जरी टरकलेली असली तरीही कुणीच दाखवत नव्हतं... 
"सुश्या - त्या दोन मध्ये चुकलोय रस्ता... आता सरळ चालू देऊ... फाटा सापडेल"
त्या भयाण वातावरणाचा परीणाम भितीत बदलला होता...
अशात गाडी बंद पडायला नको... हीच मोठी प्रार्थना होती.
.
एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं. अर्धा पाऊण तास तसाच गेला... पाऊस पडतच होता. त्यामुळे खिडक्या बंद होत्या... 
रस्ता संपत नव्हता. अर्धा-पाऊण तास तसंच चालत होतो. गाडी चालवून जाम लागली होती.
पाऊस, थंडी, थकवा आणि भितीचा एकत्रित परीणाम म्हणून निसर्गाची हाक आली... त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता... त्यामुळे फाटा गेला खड्डयात आधी अॅटलिस्ट आडोसा शोधून मोकळं होवू या शोधात असतांनाच...
.
त्या सुमसाम रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं... "फायनली..!"...
इथे मोकळं होवू आणि माहूरचा रस्ता विचारु. आता रस्ता सापडेल आणि पोहचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली...
गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो.
केदारने सवयीनं त्याची सॅकही घेतली...
मी आणि सुश्यानं आधी एका बाजूला जाऊन शू केली...
तिथेच पावसात पाय धुतले. कानाला हात लावला आणि घराकडे आलो.
.
जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठ्ठं घर होतं...
शेताच्या एंट्री वर एक लिंबाचं मोठ्ठं झाड, 
घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्यभाग किमान प्रकाशमान होता. 
एक छोटा पोर्च होता.
एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली.... तिच्यापुढे चारा वगैरे पडला होता..
एक कुत्र त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं...
पाऊस, काळोख
एकुणच भयाण वातावरण...
अचानक सुश्याचं लक्ष कोपऱ्यात गेलं, तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता... त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे...
आम्ही चौघं चक्रावलो... 
एकुण भयाण वातावरणात ते भितीदायक होतं...
.
रस्ता विचारणं महत्वाचं होतं, आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने
तश्याच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चजवळ आलो...
दरवाजा उघडाच होता, पण आतमधलं दृष्य विचित्र होतं..
आतमध्ये सात ते आठ माणसं तश्याच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते... 
.
घर पूर्ण उघडं होतं... मी आणि सुश्यानं दरवाजा वाजवून ''भाऊ" "दादा" वगैरे हाका मारल्या... पण काहीच फरक पडला नाही.
मध्ये जावूयात कां ? 
.
एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते..
त्या भयाण वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भिती घालत होती. 
पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस...
पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा...
सगळं समजण्यापल्याड होतं...
.
आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात 
इतक्यात एक गडगडाट झाला... आणि वीज चमकली..
केदारला अचानक काय झालं कळलं नाही...
तो ओरडलाच..
"तेजा, सुश्या, प्रसाद.. थांब...."
आमचा पाय ठिकाणीच थांबला...
निघू इथून.. चल... गाडी काढ..."
आणि घाईत ओरडतच ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं... चल...
आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच..."
याला काय झालं अचानक ?
एकुण प्रकार काय ?
नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरु झाली ?
हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो...
सुश्या गाडी चालवत होता.
....

केदारने गाडीत बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोप ताणली...
कुणीच काही बोलत नव्हतं..
सगळं कळण्यापलिकडे होतं...
केदारचं वागणंही विचित्र होतं... मी, सुश्या आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो...
रात्रीचे ३ वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता...
फूल व्हॉल्यूम म्यूझिक फक्त होतं...
तोच सुन्न रस्ता... काळोख...
.
यात अजून एक गोष्ट होत होती...
ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं...
थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो...
पण रस्ता कापणं महत्वाचं होतं. त्यामूळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गुढ फार्महाऊस, केदारचं वागणं पण डोक्यात होतं...
.
दोन तास आम्ही तसेच सरळ सरळ जात होतो...
किती अंतर कापलं ? 
कुठे जातोय ?
काय सुरुय कळत नव्हतं.
एव्हाना पहाट झाली... 
पाऊस जवळपास थांबला होता...
५ वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला... "फायनली !"
.
आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच ! 
(केदार झोपेतच होता)
सुटलो बाबा एकदाचे !
त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे दारव्हा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता... 
"सापडला रस्ता....!"
माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो... आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या... माहूरचे माईलस्टोन दिसत होते.. 
हलकं वाटत होतं...
काल रात्रभर डोकं जड झालं होतं...
रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो...
गाडी लावली आणि उतरलो... 
खूप रिलॅक्स वाटत होतं... केदारला उठवलं...
चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरु होत्या...
माझी आणि सुशांतची ड्राईव्हिंगमूळे वाट लागली होती...
केदारचं डोकं दुखत होतं..
.
"पण, तुला काय झालं होतं रे अचानक केदार ? का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास ?"
केदार - "तेजा, आईशप्पथ ! कळतंच नव्हतं रे... अचानक... मी काय बोलत होतो... काय करतोय...  मी करतच नव्हतो... आपोआप होत होतं सगळं..."
केदार खोटं बोलत नसावा... कारण त्याचं वागणं, आमचं ऐकणं चमत्कारीक होतं...
आम्ही जरा चक्रावलो होतो...
तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं... याच गप्पा सुरु होत्या...
इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकीत चेहऱ्यानं आमच्या गप्पांत पडला..."
" तुमी शेतातल्या रस्त्यानं आल्यात ? तरी वाचलं ?"
..
"क्याय ? काय बोलतोय ?"
"भाऊ, ती माणसं वाचत नसत्यात... भुलभूलैया हाय तो रस्ता... औसच्या राती माणसं गिळत्यात... काल औस आसूनबी वाचल्यात ? पोरांनो.. नशीबवान हायात तुम्ही..."
चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो... आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं ? 
वाचलं ? काय ?
"एक मिनिट... नीट सांग भाऊ... काय आहे ते ?"...
- "डेंजर होतं भाऊ"... देवाची कृपा समजा... मारुतीला नारळ फोडा.. गुरूंचं दर्शन करा"
चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो... त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता...
पण चहापुढे ते महत्वाचं नव्हतं...
.
झाला प्रकार भयंकर वाटत होता...
त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरुन जात होतं.
माहूरला पोहचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं पुढचं पुढे बघून म्हणून तिथून निघालो...
तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहचलो.
तिथे दोन दिवसांच्या मजेत झाला प्रवास विसरलो...
रस्ता चुकल्याने १००-१५० किमीचा आम्हाला मोठा फेरा पडला, पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयाण वाटलं इतकंच डोक्यात होतं...
मग चहावाला काय बोलत होता ?
त्याला आधी कुठे पाहिलं ? या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं... नेमकं आठवत नव्हतं !
.
माहूरहून निघायची वेळ आली. 
आम्ही गाडीत बसलो... 
मी नेहमी गाडी सुरू करतांना डिझेल, किमी वगैरे चेक करतो... त्या दिवशी पण केली. 
कीती कि.मी रिकामं फिरलो याचा हिशोब करायला...
आणि एक मोठ्ठा धक्का बसला...
ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो...
.
कारंजा ते मानोरा ४० किमी... मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट २० किमी, आणि तो चौक ते माहूर ४० किमी, इतकं जवळपास १००-११० किमीच पुढे सरकलं होतं...  मग रात्री १२:३० ते सकाळी ५ः०० आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किमी कुठे गेले ?
त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती...
ना गाडीतलं डिझेल संपलं होतं...
- " सुश्या भलतीच गडबड दिसतेय..."
- "हो रे ! कळत नाही काय होतंय ते ?
-  चहावाल्याला गाठू..."
- चहावाला काय बोलत होता...
- असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं..
भिती पेक्षा गोंधळ झाला होता... आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरु केला. यावेळी दिवसाच ! कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहचायचं होतं... पाऊसही नव्हता... 
.
चहाच्या टपरीपर्यंत आलो...
तिथे कुणीच नव्हतं...
हा चहावाला कुठे गेला यार ?
प्रसादनं भैया.. भाऊ करुन आवाज दिला...
रस्त्याच्या दूसऱ्या बाजूनं एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला...
बोला... काय देऊ ? चहा कॉफी ? 
हा कोण चहावाला ?
"ते दुसरे भाऊ कुठेत ?"
तो - कोण दुसरे भाऊ ?
- तेच ! जे परवा होते...
तो - नै तर... परवा पण मीच होता इथं... माझंच हॉटेल हाय... तुम्ही कोणाला भेटलं ?
अजून एक धक्का
परवा भेटलेलं ते कोण ?
चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता...
.
रस्ता चुकणं, निर्जन-अनोळखी रस्ता इथपर्यंत ठिक... तसं नॉर्मल होतं. ते घर सुद्धा... म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकत होतं..
पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं... केदारचं विचित्र वागणं... तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्याने सांगितलं ते सगळं काय होतं ?
तो माणूस गेला कुठे ?
इथे अजून जास्त गोंधळ होत होता... 
.
जास्त वाढवण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू, डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही... प्रॅक्टीकल विचारांना मनाची साथ नव्हती.. 
काहीतरी भयंकर नक्की आहे... चौघंही शांत होतो... भिती नव्हती, पण दडपण जाणवत होतं...
.
आम्ही चौकात पोहचलो... चौकातलं दृष्य अजून चक्रावणारं होतं... आम्हाला चक्कर यायचं बाकी होतं... परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो, तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जातो, एक व्हाया दारव्हा कारंजाला जातो तिसरा रस्ता माहूरकडे जातो... मग चौथा रस्ता ? आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तो ? तो रस्ता आम्हाला दिसतंच नव्हता...
त्याठिकाणी चौथा रस्ताच नव्हता...
तो रस्ताच गायब झाला होता.
काय प्रकार आहे यार हा ? 
याच चौकात आलो होतो ना ? आम्ही सुन्न झालो होतो.  
"हे तीनच रस्ते हाय भाऊ..."
एका वडापवाल्यानं सांगितलं !...
.
डोकं जड झालं होतं. असला प्रकार मन मानत नव्हतं.
कारंजा व्हाया दारव्हा ११० किमी, व्हाया मानोरा १५० किमी...
"सुश्या... आपण बघू काय प्रकार आहे ते ?
दिवस आहे, कोरडा आहे... ४० किमी जास्त तर चालेल..."
.
व्हाया मानोरा हा रस्ता पकडला... सरळ. आणि अगदी नॉर्मल... गाड्या वगैरे होत्या. तो रस्ता गायब असणं ही सीमा होती... गोंधळलेलो होतो...
जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आता आमच्या नजरा शोधत होत्या... ५०-६० च्या स्पीडनं हळू गाडी चालवत होतो... 
मी आणि सुश्या एकही टप्पा सोडत नव्हतो.
आम्ही मानोरात येवून पोहचलो... जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर...
चौघं आता सून्न होतो...  शांत होतो...
त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झीट गायब झाले होते...
मग तो न संपणारा रस्ता, ते घर.. हा काय प्रकार होता ? 
आमचा भ्रम की अजून काही ?
तो चहावाला.... तो कोण होता ?...
झाला प्रकार अविश्वसनीय होता... पण काय होता ?
.
"भाऊ, ते पुढे २० कि मी वर दोन रस्ते मिळतात ते गांव कुठलं हो ? कुठला रस्ता आहे तो ?" - सुश्यानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं !
चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं !
"तुम्हाला तो रस्ता भेटला ? - औसेला ? गेलावता त्यावर ?"
- हो... खूप लांबचा फेरा होता...
- "आगागा... पोरांहो लांबचा नव्हं... मरनाचा फेरा व्हता... त्यावर जो जातो तो परत येत नाय... रस्ता गिळतो त्याला... परत कसं आलंत तुम्ही ?
हे ऐकून आम्ही गोंधळलो... आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं ठरवलं... त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं... ! त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं, स्वतः अनुभवल्यामूळे  ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता...
"हा भूलभूलैया हाय... चकवा... एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो... अवसेला सापळ्यात अडकतो मानूस... घेरी येते... तुमाला दिसलं कायं ? भायर कसे आले ?  त्या दिसी माझा लेओक व्हता इथं... त्यानं सांगायं राहिलं की आडवी वाट पकडा... औस हाय..." 
तो माणूस त्याबाबतीत माहितगार दिसत होता...
मग आम्ही त्या माणसाला ते घर, माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं...
"तुमची घेरी आलीवती, ते घर नाय काळाचं नरडं व्हतं.. आनी ते मानसं नाय म्हडी वती... तुमी तसेच पडले असतां..."
आमच्या पायाखालची जमीन सरकली...  अंगावर शहारे आले...
"औसेच्या राती त्यो रस्ता उघडा होतो... ज्याची घेरी असंल तो त्या वाटंला जातो, आनी फसतो... ज्यानं ती रात काटली तो वाचला... त्यो घरात जो गेला तो मेला... तुमी लै नशीबवान बगा... देवाची किरपा मनून सुटल्यात... लै किस्से ऐकलंत त्या वाटेचं"
...
सगळं चित्र आमच्या समोर आलं... 
विश्वास नव्हता, पण नाकारु शकत नव्हतो... 
"आम्हीच फसलो कसं ?" यापेक्षा त्या माणसाचा 
"तुमी वाचले कसं ?"
हा प्रश्न महत्वाचा होता...
ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं...
हादरलो मात्र होतो... आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं ?
"वाचलो" ! यामुळे आम्ही मनोमन सुखावलो... त्या माणसानं सांगितलं ते खरं-खोटं देव जाणे, पण आम्ही काहीतरी विचित्र, अघटीत अनुभवलं होतं हे खरं होतं.. 
- तो उंबरठा ओलांडला असता तर ? 
- त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर ? 
"वाचलो"...
केदारने वेळीच रोखलं म्हणून !
.
यस ! केदार... तूच ! मी, सुश्या आणि प्रशांत केदारकडे थॅंकफुली बघू लागलो... केदार थोडा बावचळला...
केदार - "तेजा, आईशप्पथ ! कळतंच नव्हतं रे... अचानक... मी काय बोलत होतो... काय करतोय...  मी करतच नव्हतो... आपोआप होत होतं सगळं..."
"भाऊ तुमी कारंजात मंदीरात पाठक भटजींना भेटा... समदं सांगतीत ते"
चहावाल्याने सांगितलं...
.
आम्ही कारंजात आलो...
पत्ता विचारून पाठक गुरुंजींकडे गेलो... ते मंदिरातच होते... तिथे जाऊन भेटलो... 
माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली. त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रुममध्ये नेलं... शांततेत बोलू...
आम्ही त्यांना घडला प्रकार, चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं...
- "तुमची घेरी आली होती हे खरंय... पण महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत...
म्हणजे केदारच्या हातून कुठलीतरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करत होती... मार्ग दाखवत होती  (?)
पाठक गुरुजींनी एक हिंट फक्त दिली... आणि परत गेले...
दैवी शक्ती ? आमच्यासोबत ?
.
आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलू वर विचार सुरु केला...
रस्ता चुकणं, निर्जन-अनोळखी रस्ता ... ते घर, 
पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं... केदारचं विचित्र वागणं... तो किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले...
यातली बरीच उत्तरं मिळाली. पण नवीन प्रश्न देऊन..
.
दैवी शक्ती कोणती ? 
केदारचं विचित्र वागणं होतं ? पण केदारच का ?
याचं उत्तर शोधायला लागलो... कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं
आम्ही चौघे मित्र सोबत होतो....
चौघंही उपनयीत...
शाकाहारी...
मी आणि सुश्यानं शू केली होती. केदार नं नाही... पण प्रसादपण तर तिथेच होता...
एक एक गोष्ट पडताळून पाहिली आणि तेव्हा सुश्याला अचानक ट्रेस झालं... "सॅक"... केदारच्या पाठीवरची सॅक... हा एकमेव फरक चौघांत होता...
"केदार सॅक दे..." 
मी केदारची सॅक उघडली...
त्यात त्याच्या रोजच्या वस्तू शिवाय आणखी एक वस्तू होती...
एक महत्वाची कडी सुटली होती...
आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथेच मिळाली...
.
माझे डोळे विस्फारले गेले...
सगळं चित्र माझ्यासमोर आलं... डोळे पाणावले...
.
"फ्रेंड्स.... आपण एक महत्वाची कडी विसरत होतो... ते दोन गुरुजी आठवतंय ? आपण त्या दिवशी त्यांना बसस्टँडवर सोडलं... ! त्यांची बॅग राहीली... केदारच्या सॅकमध्येच ती बॅग होती..."
- पण त्या बॅगचा, गुरुजींचा काय संबंधय ?
- "अरे संबंध आहेच... तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा..."
- "ओहss माय गॉड... यस यस तेजा... यस" 
- "मी म्हणालो ना... ओळखीचा चेहरा आहे... तेच गुरुजी.... ! आता मानोरातले ते म्हातारे चहावाले आठवा... हे ते दुसरे गुरुजी ...!"
- "यस... म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता..."
आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो...
मी ती बॅग उघडली...
त्यात "श्री गुरुचरीत्र" ग्रंथ होता. त्या भयाण वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले, 
सरळ चालत राहू
थांबायचं नाही
त्या घरात प्रवेश करायचा नाही...
गाडी सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता...
त्या शक्तीने अमावस्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं...
.
केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता, आणि ती सॅक त्याच्या पाठीवर...!
फक्त केदारच कां ? या प्रश्नाचं हे उत्तर होतं...
.
आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली...."
"देवाची कृपा समजा... मारुतीला नारळ फोडा.. गुरूंचं दर्शन करा" 
"तुमी लै नशीबवान बगा... देवाची किरपा मनून सुटल्यात..."
त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले...
आम्ही सुखरुप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं...
ते कुणीतरी अवतारी असावेत... 
त्यांचं गाडीत बसणं, 
बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं...
आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती...
आम्ही चौघं त्याच रुममध्ये पाणावल्या डोळयांनी शांत बसलो...  चौघंही गुरुचरीत्राचं दरवर्षी पारायण करतो, 
गुरूंची अश्याप्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं
आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला...
.
तो भयाण गुढ रस्ता, चकवा, घेरी, ते घर, ती प्रेतं हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं... ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयाण रात्रींपैकी एक होती... 
तेव्हा काय प्रसंग उभा होता, काय झालं असतं ?
गुरुचरीत्राचा जागृत ग्रंथ, महाराजांवर दृढ विश्वास कवच होवून आला...
तो ग्रंथ माझ्याकडे आहे. दरवर्षी त्याचं पारायण करतो...

Sunday, May 8, 2016

THRILL…..Once Again

वाचकांसाठी एक नम्र विनंती. ह्या कथेतील संदर्भ समजुन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर माझी "Thrill" हि कथा वाचावी लागेल.
****************************************************************************************************
कधी कधी काही काही गोष्टी प्रारब्धातच लिहिलेल्या असतात. अगदी ठरवुनही टाळता येत नाहीत अश्या काही. अशीच एक गोष्ट माझीही आहे.
मला आजही आठवतय त्यादिवशी शुक्रवार होता. संध्याकाळी अंड्याचा फोन आ्लेला. अंड्या म्हणजे आनंद, माझा शाळेतला मित्र. शाळेत कुणाच्याही खिजगणीत नसलेला हा, आता सगळ्यांनी दखल घ्यावी असा मोठा बिझनेसमन म्हणुन नावारुपास आला होता. गेल्याच महिन्यात शाळेच्या रियुनिअनमधे हां भेटला होता. बिझनेस म्हणुन रुबाब वाढला असला तरी मित्र म्हणुन अगदी शाळेत होता तसाच होता. फ़ोनवरही उचलल्या उचलल्या आत्ताही त्याने शिव्यांनीच सुरुवात केली होती
"काय रे माट्या काय करतोयस?"
"काही नाही रे निवांत आहे" मी सोफ्यावर पसरलेल्या फ़ायली आवरत बोललो.
"अरे वाह!!!! मग बरंच झालं. अरे ऐक ना माझं एक काम होतं तुझ्याकडे......."
".................
..................
..................."
अंड्याने लगेचच पुढे सांगायला सुरुवात केली.
"अरे एव्हढचं ना? करू की मग. फक्त साल्या तुझ्याकडून मी माझी फी मात्र मजबूत वसूल करणार" मीही हसत हसत म्हणालो.
"ok ठीक आहे मग मी तुला उद्या दुपारी पिकअप करतो"
दुसऱ्या दिवशी दुपारी बरोबर 2.30 वाजता नॅशनल पार्कच्या बाहेर भेटायच ठरवून मी अंड्याचा फोन कट केला. अंड्याच काम तसं साधंच होतं त्याला एक रिसोर्ट बांधायच होतं. त्यासाठीच जागा पहायला तो मला बोलवत होता. मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असल्याने जागेबद्दल आणि बांधकामासंबधी त्याला माझं मत हवं होतं. सदर जागा त्याला आमच्याच एका शाळेच्या मित्राने, विरेंद्रने उर्फ़ विरुने सुचवली होती. ह्या प्रोजेक्टसाठीचे फ़ायनेंशीअल अस्पेक्टस समजुन घेण्यासाठी आमचाच अजुन एक वर्गमित्र हेमंत आमच्यासोबत येणार होता, जो आता सारस्वत को. ऑप बेंकेचा मेनेजर होता.
खरतर माझ त्या दिवसाच शेड्यूल थोडं टाईटच होतं. मला लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कंपनी कामासाठी बंगलुरला जायचय होत. सकाळचं फ़्लाईट होती. तरीही मी जायच ठरवलं. त्याच निमित्ताने शाळेतल्या मित्रांसोबत आऊटिंगही झालं असत. थोडा रिफ्रेश झालो असतो.
ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी अंडयाने मला नॅशनल पार्कच्या समोरून पिक-अप केलं. वीरू आणि हेम्या अगोदरच गाडीत बसले होते. अंड्याची नवी कोरी ’फ़ोर्च्युनर’ एकदम झक्कास होती. बाहेरच्या रखरखत्या उन्हातुन गाडीच्या आत गारेगार वातावरणात मस्त वाटत होतं. गाडीत विरुची अखंड बडबड चालु होती. त्याने सांगितलेल्या किस्स्यांनी तर हसता हसता पुरेवाट झाली होती. मला अंड्याच कौतुक वाटत होत. त्याचा गाडीवरचा कंट्रोल खरच सुरेख होता. आमच्या ह्या गदारोळात पुर्णपणे सामील असुनही गाड़ी काही 100 च्या खाली नव्हती. बोलता बोलता अंड्याने त्याचा प्रोजेक्ट आम्हाला समजवायला सुरुवात केली. प्लान मस्त होता मुंबईच्या जवळ त्याला एक फ़ॆमिली रिसोर्ट बांधायच होतं. एकदम अद्यावत. जेणेकरुन एक दोन दिवसासाठी अलिबाग-लोणावळयाला पळणार्या मुंबईकरांना टार्गेट करता येईल. फ़ायन्सान, पार्टनर्स, सगळं सेट होतं. आता फ़क्त जागा निवडायची होती.
" सो......मग जागा कुठे पाहिलीयस." मी अंड्याला विचारलं.
उत्तरादाखल अंड्य़ाने विरुकडे पाहिलं. विरु थोडा पॊज घेउन म्हणाला....
"ऊत्तन"
विरुने जागेचं नाव सांगताच माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. अवतीभवतीच सगळं माझ्याभवती फ़िरतय की काय असा भास होउ लागला. उत्तनच नाव ऐकताच इतकी वर्ष मनात कुठेतरी दडवुन ठेवलेल्या त्या दळभद्री आठवणीं वारुळातुन मुंग्या जश्या बाहेर पडाव्यात तश्या बाहेर येउ लागल्या. मला काहिच सुचत नव्हतं. त्या घडल्या प्रसंगापासुन मी तिकडे कधीच फ़िरकलो नव्हतो आणि आज नेमका त्याच ठिकाणी परत जात होतो. माझ्या मनात फ़ार नकरात्मक विचार येत होते. मला इथुनच परत फ़िरावसं वाटत होतं. बारा वर्षापुर्वी त्या रात्री घडलेला तो प्रसंग प्रत्येक बारकाव्यानिशी मला आजही लक्षात होता. त्या रात्रीच्या त्या प्रसंगाने आम्हा सगळ्यांची आयुष्य बदलुन गेली होती. कित्येक रात्री मी बिना झोपेच्या घालवल्या होत्या. मी तर त्या प्रसंगानंतर बाईक चालवायचीदेखिल सोडली होती.
"काय रे काय झालं.......गेला अर्धा तास नुसता गप्प बसुन बाहेर बघतोयस. चल उठ आता. साईट आली"
हेमंतच्या ह्या वाक्यासरशी मी एकदम तंद्रीतुन बाहेर आलो. थोडावेळ मी नक्की कुठेय हेच कळत नव्हतं. गाडी थांबली होती. अंड्या आणि विरु गाडीतुन उतरण्याच्या तयारीत होते. मी घड्याळात पाहिलं तर चार वाजले होते. नाईलाजास्तव गाडीतुन उतरलो. आम्ही अंड्य़ाच्या प्लॊटच्या समोर उभे होतो.
विरेनने दाखवलेला हा प्लॊट चांगला होता. एका रिसोर्टसाठी लागणारं लोकेशन, अक्सेस ह्या सगळ्या दृष्टीने सोयीचा होता. अंड्या मला रिसोर्ट्च्या ले-आउट आणि बांधकामासंबधी त्याचे प्रश्न विचारत होता. पण माझं लक्षच नव्हतं. राहुन राहुन सा्रख्या मनात त्या जुन्या आठवणी घोंगावत होत्या. मी देत असलेली उत्तरं पाहुन अंड्याला ’ह्याला उगीच येथे घेउन आलो, एखाद्या प्रोफ़ेशन माणसाला आणला असता तर बरं झालं असतं’ अस वाटत होतं आणि ते त्याच्या चेहर्यावरुन स्पष्ट कळतं ही होत. अखेर माझा नाद सोडुन अंड्या हेमंतकडे वळला. हेमंतने त्याला ह्या जागेची कागदपत्र आणि काही बेसीक ड्रॊईंगस मिळाली तर त्याच काम होउ शकत असा विश्वास दिला. आता उगाच आपल्याकडुन उशीर नको म्हणुन विरेननेही त्याच्या मध्यस्थाला ती कागदपत्र लगोलग घेउन यायला सांगितली.
नाही नाही म्हणता, संध्याकाळी आम्हाला उशीर झालाच. जागेचे कागदपत्र आणि नकाशे आणुन देणारा माणुस, जो पाचाला यायचा तो सात वाजता आला. जसजसा अंधार पडू लागला तस माझ्या जीव घाबराघुबरा होउ लागला. मला तेथे एक क्षणही थांबावसं वाटत नव्हतं. अखेर सगळी कागदपत्र व्यवस्थीत पाहून अंड्या आणि हेमंतने समाधानाचा सुस्कारा सोडला. आम्ही परत गाडीत येउन बसलो. एव्हाना पाउणे आठ वाजले होते.
"आता काय करायचं ???" अंड्याने सीट बेल्ट लावता लावता विचारलं. मी काही बोलणार इतक्यात
"इथूनच जवळ साईदर्या नावाचा फट्टे धाबा आहे...तिथे बसूया......सॉल्लिड जागा आहे जेवण दारु ए-वन......" हे सांगताना विरुने ओठांवरुन जीभ फिरवली.
" अरे वाह ......सही है..........तसही हे जागेच डील आता फायनल होण्यातच जमा आहे. त्याचीच पार्टी आज करून टाकू" अंड्या खुशीत येत म्हणाला.
अंड्याच्या ह्या प्रपोजलवर सगळे तयार होते, फ़क्त मी सोडुन. मी माझा नकार दिला, त्यावर ते तिघेही माझ्यावर चढले. मी त्यांना माझं दुसर्या दिवशी बंगलुरला जायचं कारन सांगितलं. सकाळी फ़्लाईट असल्याचंही सांगितलं. पण ते काहीएक ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. त्यांच्यासमोर माझा विरोध सर्व बाजुने थिटा पडू लागला. अखेर मग मी ही त्यांच्यासोबत जायला तयार झालो. कारण ते तसेही माझ काही ऐकणार नव्हते आणि रात्री दहाला जरी इथुन निघालो तरी भाईंदर मार्गे बोरीवली जास्तीत जास्त 2 तासात घरी पोहचणार होतो म्हणुन मग मीही जास्त आढेवेढे न घेता आता निमुट्पणे माझा नकार होकारात बदलुन टाकला.
आम्ही आता साईदर्याला बसलो होतो. विरुने सांगितल्यानुसार ति जागा खरच उत्तम होती. आमच खाणं आणि दारुकाम दोन्ही तब्येतशीर चालु होतं. बऱ्याच दिवसानी भेटल्यामुळे टेबलावर चाखण्यासोबत शाळेतल्या जुन्या किस्स्यांचीही रेलचेल होती. हेम्याकडे तर असल्या किस्स्यांचा खजिनाच होता. साल्याच्या बऱ्याच गोष्टी लक्ष्यात होत्या आणि तो त्या अफ़लातुन रंगवुन सांगत होता. आमची हसता हसता पुरेवाट झाली होती. मी तर बऱ्याच दिवसाने इतका हसलो होतो.
"अरे तुम्हाला आता एक सॉल्लिड स्टोरी सांगतो....." अस म्हणुन हेम्याने अजुन एक किस्सा सांगायला सुरुवात केली.
"तुम्हाला आपला तो चिनू आठवतोय .....चेतन शिंदे..... दहावी ब मधला.....एकदा तो, परवडी, चप्पा आणि चौथा कोण होता बरं?......हा आठवलं..... अंकुर.....ते लोक इथे गोराइ-उत्तन रोडवर पूर्वी रात्रीचे बाईक चालवायला यायचे. एके रात्री म्हणे त्यांची अशी वाट लागली की, त्यारात्रीपासुन त्यांनी इथेच काय तर दिवसा चाराकोपमधेदेखिल फिरायच बंद केलं"
"का रे...एव्हढं काय झाल असं ??????" वीरूने एक्साईट होतं विचारलं
"अरे त्यांना म्हणे इथे कुणीतरी दिसलेल. बाई की काहीतरी... चिन्या तर चांगला आठवडाभर आजारी होता त्यानंतर." हेमंत दारुचा सीप मारता मारता म्हणाला.
"चल बे भंकस" आनंदने हेम्याला फ़ाट्यावर मारलं.
विरेंननेही अंड्याला साथ दिली. तसा हेमंतही त्यांना सामील होता. त्याचे आता ह्या घटनेवर विनोद चालु झाले. सगळे जोरजोरात हसत होते. फ़क्त मी सोडुन.
हेमंतच्या तोडुंन हां किस्सा ऐकून मला तर धक्काच बसला. मी विचार करू लागलो की हे सगळं ह्याला कसं कळालं?? कारण ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही हे शपथेवार आम्ही ठरवलं होतं. मग तो वायदा कुणी मोडला होता???
"तूला कुठुन कळली ही गोष्ट??" मी हेमंतला विचारलं
"अरे रायझिंग क्लबमधे फुल्ल फेमस आहे ही स्टोरी" हेमंतने हसता हसता मला त्याच उत्तर दिलं
मला आता चप्पाचा फार राग आला होता. ह्याचा अर्थ त्या हरामखोरानेच ही गोष्ट फोडली होती. हेमंतचे विनोद अजुन चालूच होते. माझ डोक आता सरकलं होतं.
"हेम्या, प्लीज ही गोष्ट हसण्यावारी नेउ नकोस. तू तिथे असतास, तर आज त्या गोष्टीवर एव्हढा हसला नसतास" मी नाराजीने हेम्याला म्हणालो
"तुला कसं माहीती?" मला गंभीर झालेल पाहता हेमंतने विचारलं.
"कारण, त्या रात्री तिथे चौघे नाही तर पाचजण बाईक चालवायला गेले होते आणि.............. पाचवा मी होतो"
माझ्या ह्या वाक्यासरशी ते सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने पहायला लागले. त्या तिघांकडे एक नजर टाकुन मी सांगायला लागलो.
आमचं ते गोराईला येणं.
ते सुसाट बाईक चालवणं.
मग एका वळणावर मला लागलेला चकवा.
पुढे मला दिसलेली ती बाई अन तिच्यासोबतची ती मुलगी.
त्यांना घाबरून मी गाडी पुढे पळवत असताना मला मागाहुन येऊन गाठणारे परवडी आणि अंकुर.
परत येताना रस्त्याच्या कडेला भेदरलेला चप्पा आणि चिनू.
चिनुला आलेली फ़िट.
बोटीत चप्पाने सांगितलेला त्याच्या आणि चिनुवर गुदरलेला तो भयानक प्रसंग.
हे सगळं ऐकून त्या बोटीतल्या काकांनी आमची केलेली कान उघडणी.
सगळं सगळं सांगितलं.
तो प्रसंग त्यांना सांगताना तेव्हाही माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. तेव्हाही तो प्रसंग अगदी डोळ्यांसमोर घडत असल्यासारखा वाटत होता. अगदी जश्याच्या तसा.
मी सांगितलेला तो प्रसंग ऐकताना सगळे आता एकजात शांत होते. मगास पासून बडबडत असलेला हेमंतही आता माझ्याकडे गंभीरपणे पाहू लागला. एक दोन क्षण गेले असतील की आनंद अचानक जोरजोरात हसायला लागला. आनंदला हसताना पाहून आधी हेमंत आणि मागोमाग विरेंद्रही हसायला लागले. मला काही कळेचना की हे असे माझ्यावर का हसताहेत. माझ्या चेहऱ्यावरचे ते गोंधळलेले भाव पाहून तर त्यांना अजुनच चेव आला. हेमंत आणि विरेंद्र माझ्याकडे पाहून हसताना आता एकामेकांना टाळ्या देत होते. आनंदच्या डोळ्यांत तर हसून हसून पाणीच आलं होतं. त्यांच्या ह्या अश्या प्रतिक्रियेमुळे मी समजुन चुकलो होतो, की त्यांनी मला सपशेल मुर्खात काढलं होतं. मी हताशपणे माझ्या हातातला ग्लास संपवला आणि दुसरीकडे पाहू लागलो. मला असं शांत असलेलं पाहून आनंद आपल हसणं आवरत मला म्हणाला.
"सॉरी यार अमोल, रागावू नकोस पण तू सांगितलेला हा किस्सा बराच कॉमेडी होता. तुम्ही इथे बाईक चालवता काय, तुम्हाला ती बाई दिसते काय आणि मग तुम्ही सगळे घाबरून पळत सुटता काय. सगळीच भंकसबाजी नुसती"
"भंकसबाजी????" मी ज़रा घुश्श्यातच विचारलं
"नाहीतर काय, मला काही पटत नाहिए हे सगळं. त्यारात्री तुझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सगळे एकतर आपापल्या बाइकस हेडलाईट ऑफ़ करून चालवत होतात. त्या वळणानंतर अंकुर आणि परवडीने आपल्या बाईक्स रोडच्या कडेला दडवल्या असणार आणि तुला पुढे पाठवलं असणार. रात्रीच्या अंधारात तुला ती गोष्ट नक्किच जाणवली नाही. म्हणुनच मग त्यांनी तुला मागाहून पुढे गाठला आणि तुला वाटलं की तुला चकवा लागलाय. आणि रहाता राहिली त्या बाई आणि त्या मुलीची गोष्ट, तर भित्याच्या पाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तेच खरे. तुला त्या रात्री नक्कीच भास् झाला असणार. एकतर तू तिथे रात्रीचा एकटा होतास आणि त्यात प्रचंड घाबरलेला होतास. तेव्हा तुझ्या डोक्यात नको नको ते विचार चालु असणार. अश्या वेळेस आपल्याला जूने ऐकलेले, वाचलेले संदर्भ आठवतात आणि आपलं घाबरलेलं मन त्याच संदर्भाची आपल्याभवती एक आभासी प्रतिमा तयार करते व आपल्याला ते सगळं खरं वाटु लागतं. तसच काहीस तुझंही त्यावेळेस झालं असणार. म्हणुनच ती बाई तुला एकटा असताना दिसली, मागाहून परत येताना अंकुर आणि परवडीसोबत येताना तुला ती बाईच काय तर तो बस स्टॉपही दिसला नाही." आनंदने माझ्या त्या घटनेवर मांडलेल्या ह्या तार्कीक सिध्दांतावर सगळ्यांनी माना डोलावल्या.
"माझं एकवेळ ठीक आहे, पण मग चप्पा आणि चिनुच काय?" मी अजुनही माझी बाजू मांडत म्हणालो.
"त्यांच काय? त्या दोघांना मी पुरेपुर ओळखतो" आनंद हातातला ग्लास रिकामा करीत म्हणाला.
"मला पुर्ण खात्री आहे की ह्या सगळ्यामागे तो हरामखोर चप्पाच आहे. त्यानेच चिनुला त्या रात्री घाबरवलं असणार. चिनू तर ऑलरेडी एक नंबरचा फट्टू आहे. त्यांची तेव्हा तंतरली आणि त्यातच भीतीचा ओव्हरडोस झाल्याने त्याला फ़िट आली असणार. चिनुला असं पाहून तुम्ही सगळे आता त्याच्यावर चढणार ह्याचीच भिती वाटल्यामूळे चप्पाने तुम्हाला ती खोटी कहानी ऐकवलीय. बाकी काही नाही". आपण एक सॉल्लिड मिस्ट्री स्लोव्ह केल्याच्या अविर्भावात अंडयाने आपला पेग संपवला आणि सगळ्यांकडे पाहिलं. विरु आणि हेम्या कौतुकाने अंड्याकडे पहात होते.
"पण मग त्या बोटीवरल्या काकांनी सांगितलेल ते ?" मी अजुनही आपला मुद्दा मांडत होतो, पण त्यात आता काही पहिल्यासारखा जोर नव्हता.
"अरे यार.....अमोल काय तू पण लहान मुलांसारखा प्रश्न विचारतोयस. तुम्ही चारचौघात, लोकांसमोर असला काही विषय काढलात की त्यांना काय जातय शेंड्या लावायला. कोकणात तर असल्या गजाली भरपूर मिळतील. आता मला एक सांग. त्यारात्री तुम्ही पाचजण होतात....... बरोबर ना? मग ती बाई आणि ती मुलगी फ़क्त तुम्हा तिघांनाच कशी दिसली? आणि तीही वेगवेगळी?????" आनंदने वैतागत विचारलं.
आनंदच्या ह्या प्रश्नांला माझ्याकडे खरच काही उत्तर नव्हतं. माझ्या मनाला अंड्याचं हे लॉजीक पटतं नव्हतं पण ह्याचा अर्थ अंड्या काही चुकीच बोलत होता असही नव्हतं. कारण त्या सगळ्या घटनेला त्या पाचजणांपैकी फ़क्त आम्ही तिघेच साक्षीदार होतो. माझ्या अनुभवाला त्यावेळेस माझ्यासोबत ते दोघे नव्हते, तर त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगादरम्यान मी तिथे हजर नव्हतो. त्यामुळे ह्या प्रकरणातली खऱ्याखोट्याची विश्वासार्हता हि सगळी ज्याच्या त्याच्या सांगण्यावर आणि ऐकण्यावर अवलंबुन होती.
"माझ ऐक, हे भुतबीत काही नसत. आपल्या मनाचे खेळ असतात सारे. आमच्या अंधश्रध्दा निर्मूलन संघटनेत अश्या कितीतरी गोष्टी आम्ही प्रुव्ह केल्यात." अंड्या मला समजावत म्हणाला.
सगळे शांत होते. मला अजुनही पटत नव्हतं. अंड्या सांगतो हे जरी खर मानलं तरी एकद्याला इतके भास कसे होउ शकतात अन खासकरुन ते ही एकाच जागेवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेळेस. विचार करुन करुन माझं आता डोक दुखायला लागलं होतं. तेव्ह्ढ्यात.........
"मला माफ करा, पण हे साहेब जे सांगताहेत ते खरं आहे." अचानक माझ्या पाठिमागुन आलेल्या त्या आवाजाने आम्ही सगळेच चमकलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं असता, तिथे त्या हॉटेलचा वेटर उभा होता. बहुतेक मगासपासुन तो आमचं हे बोलणं ऐकत असावा. आनंदने त्याला खुणेनेच जवळ बोलावलं.
"काय म्हणालास?" अंड्याने आवाजात जरब आणत विचारलं.
"नाही म्हटलं, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं. त्या रोडबद्दल आणि तिथे घडलेल्या घटनेबद्दल. तुम्ही कितीजरी नाही म्हटलं तरी हे साहेब जे सांगताहेत ते खरं आहे." तो माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला.
"त्या रस्त्यावर सहसा रात्रीचं कुणी एकटं दुकटं फिरत नाही. आजवर त्या परिसरात बऱ्याच जणांना असेच काहीसे विचित्र अनुभव आलेले आहेत." तो वेटर कधी माझ्याकडे तर कधी अंडयाकडे पहात बोलत होता.
"कश्यावरुन बोलतोस तू हे? तू स्वत: अनुभवलं आहेस का ते? का ती बाई.... जी म्हणे तिथे दररात्री उभी असते, ती तुझी आयटम आहे? आणि तिने तुला हे सगळं सांगितलय" अंड्याने छ्द्मीपणे हसत त्याला विचारलं.
"नाय...... मी स्वत: नाही अनुभवलं. पण इकडची सगळी लोक तेच सांगतात. तुमच्या सारखे बरेचसे मी मी म्हणणारे तिथे गेल्यावर ढुंगणाला पाय लावून परत आले." त्या वेटरनेही आनंदने त्याच्यावर केलेल्या विनोदाला चपराक दिली होती.
"शट अप......मुर्ख कुठला..... असं कधी असतं का? सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत बाक़ी काही नाही." अंड्या आता सॉल्लीड भडकला होता.
"तुम्हाला एव्हढच जर का हे सगळं खोट वाटत असेल तर मग साहेब तुम्ही स्वत:च तिथे जाउन खात्री का नाही करून घेत?" वेटरही अंड्याला आता चेलेंज देत म्हणाला.
"अरे जातो की. मी कुणाच्या बापाला भीत नाही. आणि आता तर मला ह्या गोष्टीची शहनिशा करायचीच आहे." अंड्याही आता आवाज चढवत म्हणाला.
अंड्याचा आवाज ऐकून एव्हाना आजूबाजूचे लोक आता आमच्याकडे पाहू लागले होते. गोष्ट हाताबाहेर जाऊ नये म्हणुन मग मी आता मधे तोंड घातले.
"जाऊ दे ना यार...कशाला उगाच हायपर होतो.... सोड ना..." मी आनंदला समजावत म्हणालो.
"तू तर शांतच रहा...मगाशी तर तूच ही गोष्ट मला पटवुन देत होतास, मग आता काय झालं? आता काही नाही. आपण आत्ताच, ह्या क्षणाला तिथे जाणार आहोत. ही गोष्ट खरी असेल तर मग मलाही ती पहायचीय आणि नसेल तर निदान तुमच्या मानेवरच हे संशयाच भुत तरी उतरेल." शेवटच वाक्य अंड्याने त्या वेटरकडे पाहून उच्चारलं.
एव्हढं बोलुन अंड्या ताडकन टेबलावरुन उठला. त्या वेटरला बील किती झालं विचारुन, हजाराच्या पाच करकरीत नोटा टेबलावर टाकल्या. काय होतय हे समजायच्या आतच अंड्या त्याच्या गाडीजवळ पोहचला देखिल. बघता बघता एक हसरी संध्याकाळ एका तणावाच्या रात्रीत बदलली होती.
******************************************************************************
आम्ही चौघेही आनंदच्या गाडीजवळ पोहचलो. मी पुन्हा एकदा अंड्याला समजावायचा प्रयत्न केला पण अंड्या आता काहिएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विरुने मला गपचुप गाडीत बसायची खुण केली. आता हे काही ऐकत नाहीत ह्याचा अंदाज येताच मीही मग मुकाट गाडीत बसलो. अंड्याने तिरमिरीत गाडी चालु केली. त्यावेळेस गाडीच्या स्टार्टरचा झालेला जोरदार आवाज अंड्याच्या भडकलेल्या मनस्थितीचा अंदाज देत होता. गाडी हॉटेलच्या बाहेर आली. डाव्या बाजुला भाइंदर होतं पण आमची गाडी उजव्या बाजुचं वळण घेउन गोराई गावाच्या दिशेने धावू लागली होती.
गाडीने आता चांगलाच वेग पकडला होता. चारपाच मिनिटांतच रस्त्याच्या आजुबाजुची सगळी जाग संपली. अंड्या त्या अंधार्या रस्त्यावर त्याच्या उद्दाम हेडलाईटच्या जोरावर गाडी सुसाट पळवत होता.
गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हत. एक साधासा विषय एव्हढ्या टोकाला जाईल अस अजिबात वाटलं नव्हतं. सगळेच शांत होते. मी बाहेर पाहू लागलो. बाहेर अंधार आमच्या सोबत पळत होता. ऎव्हढ्या वर्षानी इथे येत होतो तरी अजुन इथे काही फ़रक पडलाय अस वाटतं नव्हत. गोराई उत्तनचा हा रोड अजुनही तसाच होता.
एकटा..........सुनसान...........
मी माझ्या स्मरणशक्तीला जोर देऊ लागलो. पण ओळखीच्या कुठल्याच खुणा सापडत नव्हत्या. मी मनात विचार करत होतो की अंड्या जस म्हणतोय तेच खरं असू दे. मी मनाशी बाहेर बघायच नाही असं ठरवलं. तरी माझी नजर माझा इशारा फ़ाट्यावर मारून बाहेर त्या बस थांब्याचा वेध घेत होती. बराच वेळ झाला तरी आजुबाजुला काळोखाखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हत. आता मलाही मगाशी अंड्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या त्यात तत्थ्य वाटु लागलं होतं.
तेव्हढ्यात अचानक रस्त्याच्या उजव्या बाजुला मला तो दिसला. अगदी जश्याच्या तसा. रस्त्याच्या कडेला गडद अंधाराच्या साक्षीने त्या रोगट दिव्याच्या सोबतीने अजुनही आपलं गुढ अस्तित्व जपुन असलेला.
त्याला पहाताच मी नखशिखांत शहारलो. मी घाबरून तिकडे पहायचं नाही ठरवलेलं, पण आज माझ्या डोळ्यांनी माझी कुठलीच गोष्ट ऐकायची नाही अशीच ठरवली होती बहुतेक, मी नाही नाही म्हणत असतानाही माझी नजर सारखी त्या बस थांब्यावर जात होती आणि क्षणाक्षणाला त्याच अस्तित्व माझ्या मनपटलावर कायम होत होतं. गाडी जसजशी त्या बस थांब्याच्या जवळ पोहचत होती तसतसा त्याच तिथे असणं हे अजुन ठळक होत होतं. तो खरच तिथे होता. ह्याचाच अर्थ, त्या रात्री मला भास् झाला नव्हता ह्याची मला आता पुर्ण खात्री पटली. तो जसजसा माझ्या जवळ येत होता, तसा मी ही मग माझ्या इच्छेविरुध्द आता त्याच्याकडे निरखून पाहू लागलो.
आणि एका क्षणाला माझे डोळे आता भीतीने पांढरे पडायचेच बाकी होती.
तो बस थांबा......आजही तिथे एकटा उभा नव्हता. तिथे त्याच्यासोबत एक बाई उभी होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा एकदा डोळ्यांची उघडझाप केली पण समोरच्या दृश्यात काही फरक पडला नाही. मी आता सॉल्लीड घाबरलो होतो.
मला खरच वाटत नव्हत. मी पाहिलं तर ती एकटक आमच्या गाडीकडेच पहात होती. आमची गाडी आता बरोबर तिच्यासमोरून पास झाली. मी ही तिच्याकडे वळुन पहिलं, ती आता मागे मागे जात होती. पण तिची ती नजर अजुनही आमच्या गाडीवरच खिळलेली होती.
तेव्हढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी भीतीने जवळ जवळ किंचाळलोच. मी वळुन पाहिलं तर तो विरु होता. माझ्या जीवात जीव आला.
"काय रे, काय झालं असं ओरडायला???" मला अस घाबरलेल पाहून वीरूने मला विचारलं.
"अरे तुम्ही....तो बस स्टॉप.....ती बाई.....तुम्ही तिला पाहिलं नाही का?" मी अजुनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो.
"काय झालं? नीट सांग".....अंड्याने रेअर मिरर मधून माझ्याकडे पहात मला विचारलं.
"अरे तुम्ही तो आता पास झालेला बस स्टॉप नाही पाहिलात का? आणि तिथे उभी असलेली ती बाई." मी थरथरत त्याला विचारलं.
त्यासरशी अंड्याने जोराचा ब्रेक मारला. त्या शांत वातावरणात गाडीचा तो आवाज केव्हढ्याने तरी घुमला. आम्ही समोर पाहिलं तर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशाव्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. अंड्याने घुश्श्यात माझ्याकडे वळुन पाहिलं.
"तुझ्या ना आता एक कानाखाली वाजवेन अमोल....... काय फालातुगिरी लावलियस मघासपासुन. मी एव्हढा वेळ ड्राईव्ह करतोय पण मला कसा नाय दिसला तो....तू पाहिलास का रे वीरू????" अंड्याने विरुला विचारल तस मी विरुकडे पाहिलं. तर वीरू माझ्याकडे काळजीने पहात होता. त्याने माझ्या डोक्याला हात लावून पहिला आणि लगेच माझ डोक स्वत:च्या छातीशी कवटाळुन नाटकी स्वरात म्हणाला.
"अल्ले माझ्या शोन्या अस नाई वागायच ले...... बाहेरून बुआ येईल आणि तुला घेउन जाईल समजलं"
विरेनच्या ह्या कृतीनंतर गाडीत एकच हसण्याचा आवाज घुमला. मला खरच विश्वास बसत नव्हता की तो बस स्टॉप माझ्याशिवाय ह्या गाडीत दुसर्या कुणीच पाहिला नव्हता का? ते अजुनही माझ्याकडे पाहुन हसतच होते. मी बावचळुन त्या सगळ्यांकडे पाहिलं. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की, अंड्या आणि विरु वेड्यासारखे हसत असताना, पुढे बसलेला हेम्या मात्र गप्प होता. त्याच्या त्या घाबरलेल्या चेहरयाकडे पाहून मी समजलो की मगाशी त्या बाईला ह्या गादीतुन फ़क्त मी एकट्यानेच पाहिलं नव्हतं.
हसता हसता अंड्या गाडीच्या बाहेर उतरला.
"कुठे चाललायस?" मी न रहावुन त्याला विचारलं.
"साल्या तुझ्या ह्या हॉरर स्टोरी मुळे माझी घाबरून हालत खराब झाली आहे." असं बोलून अंड्याने आपली करंगळी वर केली आणि अजुन जोरात हसायला लागला.
त्यासोबत हसता हसता विरेनही बाहेर पडु लागला सोबत मलाही ओढु लागला.
"तू पण चल.....नाहीतर आमची गाडी खराब करशील" ह्यासरशी ते दोघेही अजुन जोरजोरात हसत होते. मला माझीच खुप चीड येत होती. साली कुठुन अवदसा आठवली आणि ह्यांच्यासोबत इथे आलो.
एकएक करुन सगळे गाडीच्या बाहेर आले. विरेनने बाहेर येताच एक जोराचा आळस दिला. अंड्याने एक सिगरेट शिलगावली. एक जोरदार कश मारत ती विरुच्या हातात दिली. विरुनेही आकाशाकडे पहात एक जोरदार कश मारला आणि म्हणाला.
"काय साला चांदण पडलय बघ. असं वाटत की ह्या शांत वातावरणात हे चांदण पहात इथेच एक बाज टाकुन पडून रहाव."
"वाह विरु क्या बात कही है, तू साला खरा कवी माणुस. नाहीतर काही लोक नुसतं कागदावरच चांगल लिहितात आणि प्रत्यक्षात मात्र अश्या चांदण्या रात्री बसस्टॉप आणि बाई बघत रहातात" आनंदने हां शालजोडीतला अहेर खास माझ्यासाठी दिला होता हे न कळण्याइतका मी काही मुर्ख नव्हतो. अंड्याच्या ह्या विनोदावर विरु जोरात फसफसला. अंड्या आणि विरु जोरजोरात हसत होते. त्या निर्जन रस्त्यावर आता फ़क्त त्या दोघांच्याच हसण्याचा आवाज घुमत होता.
अचानक मला जाणवलं की ही तीच जागा आहे जिथे गेल्यावेळेस परत येताना आम्हाला चप्पा आणि चिनू भेटले होते. मनातल्या शंकेचं खात्रीत रुपांतर होताच. भितीची एक थंड लहेर माझ्या शरीरातून आरपार झाली. मी दचकून इकडे तिकडे पाहिलं. त्या रात्रीच्या किर्र्र काळोखात आम्ही तिथे एकटेच होतो.
आणि तितक्यातच........
आमच्या अगदी पाठीमागुन कुणीतरी जोरात किंचाळत रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पळालं.
आम्ही पटकन मागे वळालो. मागे त्या अंधार्या एकाकी रस्त्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. अचानक घडलेल्या त्या विचित्र गोष्टीने सगळेच दचकले होते. अंड्या आणि विरु दोघेही झाल्या प्रकाराने शांत झाले होते. असेच एकदोन क्षण गेले असतील की, पुन्हा कुणीतरी आमच्या मागुन पुन्हा किंचाळत धावत गेले. त्या निर्जन रात्रीतली ती बेसुर किंचाळी अंगावर काटा उठवुन गेली. आम्ही गरकन मागे वळालो पण पुन्हा तेच. त्या रस्त्यावर...नाही खरतर त्या पुर्ण परिसरात आमच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. हा सगळा काय प्रकार चाललाय हे कुणालाच काही कळत नव्हतं.
"काय होतं ते?" विरुने दबक्या आवाजात हळुच विचारलं. आज संध्याकाळपासून पहिल्यांदाच विरेनच्या आवाजात मला भिती जाणवली होती.
हां काय प्रकार काय असु शकतो ह्याचा मला एव्हाना अंदाज आला होता, अखेर ज्याची भिती होती तेच घडत होतं, मी म्हटलं अंड्याला की मला हे काही ठीक नाही वाटत आहे. आपण निघुया इथून. पण आनंद ह्यावर काहीच बोलला नाही. त्याची शोधक नजर आसपासच्या सगळ्या गोष्टीवरून सारखी भिरभिरत होती. मगाशी घडलेला तो प्रकार नक्की काय असावा याचा तो आपल्या परीने अंदाज बांधत होता बहुतेक. काही क्षण असेच शांततेत गेले, अंड्या काही उत्तर देत नाही हे पाहून मी पुन्हा त्याला इथून निघण्याबद्दल सुचवलं पण अंड्या माझ्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत अजुनही आजुबाजुलाच पहात होता.
"अमोल बोलतोय ते बरोबर आहे. मलाही असचं वाटतय की आपण इथून आता निघुयात" विरु अंड्याच्या हाताला ओढत ज़रा मोठ्यानेच म्हणाला.
अंड्यालाही हे पटलं नसलं तरी विरु समोर तो काही बोलु शकला नाही. सगळेजण पटकन गाडीत येउन बसले. विरेन आता पुढे अंड्याच्या बाजुला बसला. आनंद गाडी सुरु करतच होता की.......
"हेमंत कुठय??????"
माझ्या ह्या प्रश्नासरशी ते दोघेही एकामेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. हेम्या आमच्यासोबत गाडीत नाहीय हे जाणवताच, ज्या वेगाने आम्ही गाडीत बसलो होतो त्याच वेगाने आम्ही पटकन गाडीबाहेर आलो आणि बाहेरच दृश्य पहातच आम्ही जागीच थबकलो........
आम्ही पाहिलं की, हेमंत शांतपणे एकटक रोडच्या साईडला असलेल्या झुडुपात काहीतरी बघत होता. वाऱ्यावरती गवताची पाती कशी डोलतात तसाच काहिसा हेमंत जागच्या जागी हलत होता. आम्हाला काही कळेच ना. विरुने हेम्याला हाक मारली पण हेमंतने काही प्रतिसाद दिला नाही. हां असा काय करतोय हे जाणुन घेण्यासाठी आम्ही त्याच्या दिशेने हळुहळु चालु लागलो. आम्ही आता हेम्याच्या बरोबर मागे होतो. हेमंत अजुनही तसाच होता त्या झुडुपांकडे एकटक पहात. आनंदने अलगद मागुन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुहळु त्याला आपल्या दिशेने फिरवला. आम्ही पाहिलं की, हेमंतचा चेहरा निर्विकार होता आणि त्याने डोळे मिटलेले होते. आम्हाला काहीच कळत नव्हतं. काहीवेळ शांततेत गेला असेल की अचानक, हेमंतने झटकन आपले डोळे उघडले. तेव्हा त्याला पाहून आमच्यासकट अंड्याही घाबरून दोन पावलं मागे झाला. मी तर ओरडणारच होतो कारण हेमंतने डोळे उघडले खरे पण त्याच्या डोळ्याच्या बाहुल्याच गायब होत्या. आम्ही ह्या धक्क्यातून सावरतोय न सावरतोय की, तोच हेम्या अचानक एका अगम्य भाषेत काहीतरी बडबडायला लागला. अंड्यने घाबरून आमच्याकडे पाहिलं अन त्याच क्षणाला हेमंत दात विचकुन हसला आणि एक आरोळी ठोकुन पा्ठीमागच्या त्या झुडुपात उडी मारुन गायब झाला.
आम्ही तिघेहीजण बधीरपणे त्या हलणार्या झुडुपाकडे पहात होतो.
आता त्या सुनसान रस्त्यावर आम्ही तिघे उरलो होतो. काही क्षणांपूर्वी घडलेल्या त्या विचित्र गोष्टीवर अजुनही आमचा विश्वास बसत नव्हता. पण तिथे उरलेल्या फ़क्त आमच्या तिघांच्याच अस्तित्वामुळे मगाशी घडलेली ती घटना खरी होती हे खर मानन्या वाचुन आता आमच्याकडे काही पर्याय नव्हता.
"हेमंत कुठे गेला????"
मी न रहावुन त्या दोघांना विचारले. माझ्या ह्या प्रश्नासरशी विरु आणि अंड्या तंद्रीतुन बाहेर आले. आणि सरबरल्यासारखे एकामेंकाच्या तोंडाकडे पाहू लागले. थोडा वेळ कुणीच कुणाशी बोलले नाही. मग अचानक काहितरी विचार करुन आनंद त्या झुडुपांच्या दिशेने निघाला.
"कुठे चाललायस???" मी न रहावुन त्याला विचारलं.
"हेम्याला शोधायला" एव्हढ बोलून तो त्या झुडुपांत शिरलादेखिल. मागोमाग माझ्याकडे एक नजर टाकुन विरुही आत घुसला. मला हया सगळ्यात गडबड वाटत होती पण आता माझा नाईलाज होता. ह्या ठिकाणी एकट मागे थांबण्यापेक्षा त्यांच्यासोबत पुढे जाणं परवडल असतं. देवाचं नाव घेउन मी देखील घाईघाईत विरुच्या मागोमाग आत शिरलो.
आत एकदम शांत होतं. बाहेरून ती झुडुपं लहान वाटत असली तरी आत बर्यापैकी झाडी होती. आम्ही अंदाजाने पुढे चालु लागलो. थोडा वेळ चालल्यावर ती झाडी संपली. त्या झाडीच्या बाहेर एक पठारासदृश भाग दिसत होता. विरु मघाशी बोलल्याप्रमाणे खरच आज फ़ार छान चांदणं पडल होतं. त्या निळ्या काळोखात जिथवर नजर जाईल तिथवर सपाट जमिन पसरली होती. त्यात एक काळ्या मातीचा रस्ता दुरवर कुठेतरी जात होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस चांगलं कमरेएव्हढ्या उंचीच गवत होत. ह्या चांदण रात्रीत त्या गवाताने आपला मुळचा रंग सोडल्यामुळे तिथे दुरपर्यंत कुणीतरी करड्या रंगाची चादर पसरली आहे असच काहिसं वाटत होतं. त्या निळ्या काळोखात आजुबाजुला नजरेला दिसत असुनसुध्दा मला मात्र फार भीति वाटत होती. आजुबाजुला पसरलेला हा काळोख नक्कीच कुणासाठी तरी दबा धरुन बसला असल्यासारखा वाटत होता........घात लावल्यासारखा.......
आम्ही आता त्या मातीच्या रस्त्यावरून पुढे जात होतो. मी आता अंड्या आणि विरेनच्या मधे चालत होतो. दोन्ही बाजुला पठार पसरल होतं. आम्ही दबकत दबकत चालत होतो. आजुबाजुला काहीतरी विचित्र घडत होतं हे मात्र नक्कि होतं. सगळीकडुन शांतता नुसती अंगावर येत होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. चालताना होणारा चपलांचा आवाज तेव्हढाच काय तो आमच्या सोबतीला होता. त्या परिसरात आम्हा तिघांशिवाय कुणीही नव्हतं तरी मला फार भिती वाटतं होती आणि त्याला कारण ही तसच होतं. त्या परिसरातुन आम्ही चालत असताना जेव्हा सगळिकडुन शांतता अंगावर येत होती तेव्हा मधुनच कधी आमच्या उजवीकडून तर कधी डावीकडून कुण्याच्या तरी खुसखुसण्याचा आवाज यायचा. अगदी आंधळी कोशींबीर खेळताना येतो ना तसा.
हेमंतला गायब होउन आता बराच वेळ झाला होता. हेमंतच्या अश्या गायब होण्याने आता सगळ्यांचीच तंतरली होती. आम्ही चालत चालत नाही म्हणता मुख्य रस्त्यापासून बरेच आत आलो होतो. जसजसे पुढे जात होतो, तसतशी समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येत होती. चालता चालता अंड्या मधेच थांबुन हेमंत कुठे दिसतो का ह्याचा अंदाज घेउ लागला. इतका वेळ होउनही हेम्या सापडत नसल्याच टेंशन आता अंड्याच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होत. मी रामनामाचा जप करत होतो.
"शट अप अमोल" माझ्या तोंडुन चाललेला देवाचा धावा ऐकून अंड्या माझ्यावर सॉल्लिड उखडला.
" माझ्यावर कशाला वैतागतोस? तरी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की इथे नको येउया म्हणुन. झालं समाधान. मोठा अंधश्रद्धा दूर करायला चाललेला." एव्हढ डोळ्यासमोर घडुनही आनंदने माझ्यावर केलेली आगपाखड मला सहन झाली नाही.
"तू तर गप्पच रहा........एकतर तो साला हेमंत कुठे पळालाय त्याला शोधायच सोडुन हे नको ते धंदे काय करतोयस. मला तर वाटतय की मला गंडवण्यासाठी हां तुमचाच काहीतरी प्लान आहे." अंड्या वैतागत म्हणाला.
"ज़रा तिकडे बघता का?............" विरेनने एका दिशेला अंगुलीनिर्देश करून दबक्या आवाजात सांगितल.
विरेनच्या आवाजातली भिती आम्हाला बरच काही सांगुन गेली. विरेन दाखवत असेलेल्या ठिकाणी आम्ही पाहिलं असता. आमच्या पायाखालची जमीनच सरकली.
आम्ही पाहिलं की, समोर काही अंतरावर असलेल्या एका झाडावर काहितरी लटकत होता. त्या झाडाच्या फ़ांदीवर एका झोपाळ्यासारखं हेलकावे घेत होतं. हा नक्की काय प्रकार आहे, हे जाणुन घेण्यासाठी मी त्या दिशेने निरखुन पाहू लागलो. पण माझ्या डोळ्यांना सगळीकडे पसरलेल्या त्या जांभळ्या सावल्यांखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हतं. तेव्हढ्यात अंड्या अविश्वासाने स्वत:शीच काहितरी पुटपुटला आणि त्या झाडाच्या दिशेने धावत निघाला. मी थांब म्हणेपर्यंत विरेनही त्याच्यामागे पळाला. आता मी ही त्यांच्या मागे त्या करड्या गवतातुन त्या झाडाच्या दिशेने पळत होतो..
थोड्याच वेळात आम्ही आता त्या झाडापाशी पोहचलो. तेथे जे नजरेस पडलं ते पहाता आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. दुरुन त्या झाडावर जे काही लटकताना दिसत होत, ते दुसरं तिसरं काही नसुन आमचा हेमंत होता. हेमंत त्या झाडाच्या एका फ़ांदिवर उलटा लटकुन हेलकावे घेत होता. त्याचे डोळे बंद होते.
आमच्या जीवात जीव आला की, अखेर एव्हढ्या वेळानंतर एकदाचा हेमंत सापडला होता. पण एक गोष्ट आमच्या डोक्याच्या बाहेर होती की, तो इथे अश्या अवस्थेत का होता. ह्याच उत्तर तर अंड्याच्या लॊजिककडेही नव्हतं. आम्ही डोळे विस्फ़ारुन हेमंतच्या त्या विचित्र अवस्थेकडे पहात होतो. हेमंत अजुनही त्या फ़ांदिवर उलटा लटकुन हेलकावे घेत होता. अखेर मी हेमंतला हाक मारली.
" हे मं त......."
माझा आवाज ऐकताच दुसर्याच क्षणाला हेमंतने डोळे खाडकन उघडले.
जणु काही तो त्याच नाव पुकारण्याचीच वाट पहात होता. एक क्षण त्याच्या डोळ्यात आमची ओळखच दिसत नव्हती पण पुढच्याच क्षणाला आम्हाला पाहून हेमंत ओक्साबोक्सी रडायला लागला.
"प्लीज मला इथून घेउन चला....मला सोडवा इथून" हेम्या रडवेल्या आवाजात आम्हाला विनवु लागला.
हेमंतला अश्या परिस्थीतित पाहून खरतर आम्ही थोड गडबडलो होतो. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. मला तिथून तसच पळुन जावसं वाटतं होतं. इथे आतापर्यंत जो काही प्रकार चालला होता तो अजिबात चांगला नव्हता. त्यात पुन्हा समोर ज्या पध्दतीत हेम्या आम्हाला सापडला होता त्यावरुन तरी माझी जवळजवळ खात्रीच पटली होती की आता इथे आणखी काही वेळ थांबण्यात खरच धोका होता. मी काही बोलणार इतक्यात अंड्या हेमंतला त्या झाडावरुन उतरवायला पुढे सरसावला.
अंड्या हेम्याजवळ पोहचलाच होता की, अचानक मला एक गोष्ट खटकली. हेमंतच्या चेहर्यावरच्या आतापर्यंतच्या आगतिकतेची जागा आता एका गुढ हसण्याने घेतली होती. मी अंड्याला थांबवण्यासाठी हाक मारली, माझ्या हाकेसरशी अंड्या मागे वळला. त्याचबरोबर अंड्याच्या मागे हाताच्या अंतरावर लटकत असलेल्या हेम्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याच्या चेहरयावर मगासच्या हसण्याच्या जागी आता खुनशी भाव होते. आमच्या डोळ्याची पापणी लवते ना लवते, तोच हेम्याने अंड्याला वरच्या वर हवेत उचलला. हेमंतच्या ह्या पवित्राने आम्ही तर जागच्या जागीच सरपटलो.
अंडयासारखा माणसाला अश्या विचित्र लटकलेल्या अवस्थेत हेम्याने इतक सहज उचलेलं पाहून माझी तर आता खात्रीच पटली की हां समोर आहे तो आपला हेम्या नाही. हेमंत अंड्याला त्या झाडात घेउन गेला होता. वर झाडाच्या त्या काळोख्या घेरात प्रचंड झटापट चालु होती. आम्ही अंड्याला खालून हाका मारत होतो. पण उत्तरादाखल वरून फ़क्त एक अजब गुरगुरण्याचा आवाज येत होता आणि जोडीला फ़क्त झटापटीचा आवाज. आम्हाला हे काय चाललय काहीच कळत नव्हतं. आणि अचानक अंड्याची एक अस्फुट किंचाळी ऐकायला आली आणि सगळं शांत झालं.
आणि
मगासपासुनच ते गुरगुरणं, ती पानांची सळसळ, सगळं सगळं थांबलं होतं.
मी घाबरुन विरेनकडे पाहिलं. विरेन अजुनही त्या झाडाकडे वरती पहात होता. मी पुढच्याच क्षणाला विरेनचा हात धरला आणि त्याला बळेबळे ओढतच रस्त्याच्या दिशेने धावायला सुरुवात केली.
******************************************************************************
आम्ही दोघे आता सुसाट मुख्य रस्त्याच्या दिशेने पळत होतो. आम्ही थोडेच अंतरच पळालो असु की, वीरू दमला. अगोदर ढोसलेली दारू आणि त्यात जोरात धावल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. त्याला थोडा दम घ्यायला देउन मी पुन्हा त्याला पळायला सांगतच होतो की, आमच्यामागुन आम्हाला आमच्या नावाचा पुकारा ऐकू आला. आम्ही मागे वळुन पाहिलं, तर तो आनंद होता. त्याचे कपडे फ़ाटले होते. त्याच्या अंगावर असंख्य घासल्याच्या किंवा कुणीतरी ओरबाडल्याच्या खुणा दिसत होत्या. तो लडखडत आमच्या मागुन येत होता. त्याचं सगळं अंग सोलवटलं होतं. तो विव्हळत होता. आम्ही थांबलेल पाहुन त्याने आमच्या दिशेने एक पाउल उचललं आणि धाडकन जमीनीवर कोसळला. विरेन मागे फिरला. तो अंड्याकडे जाउ लागला तसा मी लगेच विरेनचा हात धरला आणि मानेनेच त्याला नकार दिला. माझा इशारा समजुन विरेन जागीच थांबला. आम्हाला अस थांबलेलं पाहताच आनंद अजुन जोरात ओरडु लागला. आम्हाला त्याला सोबत परत घेउन जाण्यासाठी विनवत होता. त्याचा तो आक्रोश बघवत नव्हता. अखेर तो आमचा मित्र होता. खरच तो तिथुन वाचुन आला असेल तर त्याला असं इथे अश्या अवस्थेत एकट सोडुन जाणं चुकिचं होतं. पण न जाणो ह्यात काही गडबड असेल तर. कारण मघासच्या हेमंतच्या अनुभवावरुन माझा आसपासच्या सगळ्या दृश्य गोष्टीवरचा विश्वास उडाला होता. इकडे आनंदचा आक्रोश टिपेला पोहचला होता. खरच अंड्याकडे जावं की न जावं ह्यात मनाची फ़ार त्रेधा उडत होती. अखेर मनाचा हिय्या करुन मी अंड्याच्या दिशेने पाउल उचलतच होतो की,
इतक्या विनवण्याकरुनही आम्ही बधत नाही हे पाहुन अंड्या चवताळला. तो लगेच उठून आपल्या पायावर उभा राहिला. त्याची नजर आता एका जंगली श्वापदासारखी दिसत होती. जणु आपल्या भक्ष्याचा घास घ्यायला टपलेली. माझा अंड्याच्या बाबतीतला पहिला अंदाजच बरोबर ठरला होता. हेमंत सोबत आम्ही आनंदलाही गमावुन बसलो होतो. त्याचा तो अवतार पाहून मी विरेनला पळायचा इशारा केला. आम्ही दोघांनी लगेचच पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने जीवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. मी मधेच मागे वळुन पाहिलं तर अंड्या अजुन तिथेच उभा होता. आमच्याकडे एकटक पहात. मग तो आकाशाकडे पाहून जोरजोरात हसायला लागला. त्याला अस हसताना पाहुन मी माझ्या पळण्याचा वेग अजुन वाढवला. आम्हाला त्याच्यापासुन लवकरात लवकर शक्य तितकं दुर जायच होतं.
आम्ही नुसते पळतच होतो. अंड्या आता मागे पडला होता. मी पळताना मधेच मागे वळुन पहात होतो पण अंड्याचा कुठेच सुगावा लागत नव्हता. आपल्या मागावर आता कुणीही नाही हे पहाता हळुहळु आमचा धावण्याचा वेग कमी होउ लागला. मी आणि विरेन आता पुन्हा त्या गवतातल्या मातीच्या रस्त्यावरून पळत होतो. बास......हां रस्ता संपला की लगेचच मुख्य रस्ता लागणार होता. बराच वेळ जोरात पळाल्यामुळे आता माझाही श्वास फुलला होता. छाती भात्यासारखी वरखाली होत होती. थोडावेळ थांबावसं वाटत होतं, पण इथे एका क्षणाची विश्रांतीही जिवावर बेतण्यासारखी होती. आणि तसही माझ्या अंदाजाप्रमाणे इथून मुख्य रस्ता जवळ होता. नशीब चांगलं असेल तर आम्हाला नक्कीच मदत मिळणार होती.
तेव्हढ्यात धाड़ करून आवाज झाला. मी त्या दिशेंने पाहिलं तर पाठिमागे विरेन धावता धावता खाली पडला होता. त्याची हालत फार खराब झालेली. त्याला सॉल्लिड दम लागला होता. मी त्याच्याकडे परत आलो.
"सॉरी अमोल, मी नाही आता पळु शकत. मी खुप दमलोय रे......." विरेन धापा टाकत बोलला.
"अस नको करू वीरू, अजुन फ़क्त थोडा वेळ. एकदा का आपण मेन रोडला लागलो की आपल्याला नक्की काहीतरी मदत मिळेल." मी विरेनची समजूत काढत म्हणालो.
विरेन मान हलवुन नकार देत होता. मी परोपरीने विरेनला समजावत होतो. एक एक मिनिट म्हहत्त्वाचा होता. अखेर विरेनला माझं बोलणं पटलं. तो कसाबसा उठला. एक दिर्घ श्वास छातीत भरुन आम्ही पुन्हा पळायला सुरुवात करणार, तोच आमच्या उजव्या बाजुच्या गवताच्या झाडीतुन खसखस ऐकू आली. मी दचकून त्या बाजुला पाहिलं तर कुणी नव्हतं. पण बिन वार्याची ती हलणारी गवताची पाती, तिथे नक्कीच कुणीतरी दबा धरून बसलेले असल्याची साक्ष देत होती. मी नखशिखांत शहारलो. मी घाबरून बाजुला उभा असलेल्या विरुकडे पाहिलं तर तो गायब झाला होता. मी घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर मला विरेन माझ्या डाव्याबाजुला असलेल्या गवताच्या झाडीच्या खाली पडलेला दिसला. कुणीतरी त्याला तिथे त्या झाडीच्या आत फ़रफ़टत घेउन जात होत. मी त्याला पकडायला धावत त्या दिशेने गेलो पण मी तिथे पोहचेच तोवर वीरू त्या झाडीत गायब झाला होता. वर हलणारी गवताची पाती तो माझ्यापासुन दूर जात असल्याची खात्री देत होते.
मला सोल्लीड शॉक बसला होता. माझा मित्र माझ्या डोळ्यांदेखत गायब झाला होता. आता त्या परिसरात मी अगदी एकटा होतो. मी रडकुंडीला आलेलो. सगळीकडे भयाण शांतता होती. मला माझ्याच श्वासाचा आवाज ऐकू येत होता. काय करावं काहीच सुचत नव्हतं. मी अक्षरश: बधीर झालो होतो. काही तासात होत्याच नव्हतं झालं होतं. हे सगळं खरच घडतय की हे एखाद वाईट स्वप्न आहे. मला आता हे सहन होत नव्हतं. मी मटकन खाली जमिनीवर गुढघ्यावर बसलो.
तेव्हढ्यात अचानक ती निर्जन शांतता चिरत आसमंतात विरेंनची किंचाळी घुमली.
"अमोल तू पळुन जा.................."
पुन्हा एकदा आजुबाजुच्या गवतात सळसळ सुरु झाली. भितीची एक सणक माझ्या मणक्यातुन पार डोक्यात गेली. मी इशारा समजुन जोरात मेन रोडच्या दिशेने जीवाच्या आकांताने धावायला सुरुवात केली. पाठीमागे गवाताची सळसळ अजुन सुरूच होती.
******************************************************************************
मी आता त्या सुनसान परिसरात एकटाच पळत होतो. वाटेत लागलेली झाडी पार करताना चांगलाच सोलवटलो. समोरच तो गोराई उत्तनचा रोड दिसत होता. माझा जीवात जीव आला. पण तिथे पोहचून तरी काय होणार होतं देवजाणे. वेळेवर मदत मिळाली नाही, तर माझं ही काही खरं नव्हतं हे माहिती असुनही मी अक्षरश: वेड्यासारखा त्या रस्त्याच्या दिशेने पळत होतो. सुदैवाने समोरच अंड्याची गाड़ी उभी दिसली. मी धावतच तिथे गेलो. ड्राईव्हर सीटचा दरवाजा उघडला. माझं नशीब खरच माझ्या सोबत होतं, सुदैवाने चावी गाडीलाच होती. मी धापा टाकत गाडीत पडलो. मी करकचून स्टार्टर मारला. आणि नशीब गाडी पहिल्याच झटक्यात सुरु झाली.
क्लच दाबला,
गेअर टाकला,
अक्सिलेटर दिला..........
आणि पुढच्याच क्षणाला गाडी रोरावत तिथून निघाली..........
मी आता सुसाट गाडी पळवत होतो. गाडीने स्पीड पकडल्यावर, मी सुटकेचा एक निश्वास सोडला. मी त्या अभद्र जागेपासुन लांब जात होतो अन तेही सहीसलामत. पण तरीही मला रडायला येत होतं. कारण जे काही घडल होतं, त्याला फ़क्त मी एकमेव साक्षीदार होतो. हेम्या, अंड्या आणि विरु हे तिघेही आता ह्या जगात नव्हते. त्यांच्या घरच्यांना मी काय सांगणार होतो. कोण विश्वास ठेवणार होत माझ्यावर. पण मला आता त्याची फ़िकीर नव्हती. मला फ़क्त आता ह्या इथून सुटायच होतं...बास..... मला माझा जीव वाचवायचा होता. पण तरीही डोळ्यासमोरून हेम्याच अखेरच ते आमच्याकडे पाहून गुढ हसणं, अंड्याने आम्हाला दिलेली ती खुनशी नजर, आणि गवताच्या झाडीत गायब होताना विरेनच्या चेहरयावर पाहिलेली ती आगतीकता हे सगळं मी कसं विसरु शकणार होतो. मी न राहून गाडी चालवता चालवता जोरात ओरडलो. मी मोठमोठ्याने रडत, ओरडत गाडी चालवत होतो. माझा भावनावेग ओसरल्यावर मी थोडा शांत झालो. मी एका हाताच्या शर्टाच्या बाहीने माझे डोळे पुसले आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रीत करु लागलो. थोडाच वेळ गेला असेल, मला जाणवलं की ह्या गाडीत माझ्या शिवाय अजुनही कुणीतरी आहे.....
मी पटकन रेअर मिररमधे पाहिलं आणि सरपटलोच. मी गाडी कचकन ब्रेक मारून जागच्या जागी थांबवली आणि थरथरत मागे पाहिलं
पाठीमागे विरेन बसला होता. माझी आणि त्याची नजरानजर झाली. तो एकटक निर्विकारपणे माझ्याकडे पहात होता. त्याच्या डोळ्यातली माझी ओळख पुर्णपणे नाहीशी झाली होती.
मला लगेचच माझी चुक कळली. सुरुवातीला हेम्या कुठे गेला पहायला जेव्हा आम्ही गाडीतून बाहेर पडलो, तेव्हा त्या गडबडीत खाली रस्त्यावर पडलेली गाडीची चावी मीच उचलून अंड्याच्या हातात दिली होती. जी त्याने माझ्यासमोर स्वत:च्या खिश्यात ठेवली होती आणि जेव्हा मी धावत गाडीपाशी पोहचलो तेव्हा चावी गाडीलाच होती. ह्याच्याच अर्थ असा होता की हां एक सापळा होता.......माझ्यासाठी लावलेला आणि त्यात ’अमोल अविनाश परब" आता पुर्णपणे अडकला होता.
मी घाबरून त्या विरुकडे पाहिलं तर त्याची नजर अजुनही माझ्यावरच रोखलेली होती. त्याने हळुच माझ्यावरची नजर न हटवता एका दिशेला बोट दाखवलं.
मी त्या बोटाच्या दिशेने पाहिलं ......
तर तो......तोच बस थांबा होता..........पण रिकामी..........
मी गोधळुंन त्यांच्याकडे पाहिलं. त्याची नजर एकटक माझ्याकडे होती. त्याच्या चेहर्यावर आता गुढ हास्य पसरलं होतं. मी रडत रडत त्याच्याकडे पाहून हात जोडले. त्याला मला सोडण्यासाठी मी विनवु लागलो. अक्षरश: त्याच्याकडे माझ्या जीवाची भीक मागु लागलो. पण माझी हि केविलवाणी आर्जवे पाहुन त्याच्या चेहर्यावरच हास्य अजुन गडद होत होतं. अचानक तो हसायचा थांबला. त्याची माझ्यावरची हिरवी नजर अजुन तिव्र करत त्याने घश्यातल्या घश्यात एक गुरगुरण्याचा आवाज काढला आणि पुढच्या क्षणाला त्या गाडीतल्या बंद काचांमधे माझी अस्फुट किंचाळी विरून गेली.
आता सगळं एकजात शांत झालं होतं..............अगदी सुनसान..........
******************************************************************************
दैनिक युवामंच
दिं 14 जानेवारी 2016
मुंबई: गोराई उत्तान रोडवर एकाच परिसरात चार मृतदेह सापडले. चौघांच्याही मृत्युचे निदान हृद्यविकारचा तिव्र धक्का असे करण्यात आले आहे.
******************************************************************************
निळा काळोख ह्या आसमंतात आता पुन्हा दाटायला लागलाय.
ह्या जांभळ्या सावल्या पुन्हा कुणाचातरी घास घेण्यास तयार झाल्या आहेत.
आणि हां सुनसान रस्ता आजही इथे कूणाचीतरी वाट पहातोय.......पण आता सगळे सुटले्त
ती बाई,
हेमंत,
अंड्या,
सरतेशेवटी विरेनही
फ़क्त मी मागे राहिलोय........
एक एकटा एकटाच........
कुणाची तरी वाट पहात, ह्या बस थांब्याच्या खाली.....
कुणीतरी माझी, ह्या फ़ेर्यातुन सोडवणुक करेल ह्या आशेवर..... पण कुणी दूसरा कुणी हयात अडकल्याशिवाय माझी ह्यातून सुटका नाही हे पुरेपुर उमगलय मला आता.
तर मग येताय ना...............?
ह्या गोराई उत्तन रोडवर नाईट ड्राईव्ह साठी.....मला ह्यातुन सोडवण्यासाठी.....
मी तुमची वाट बघतोय.....................
समाप्त
A Story by
Amol Parab